Subscribe Us

धर्माचे नव्हे, कर्तव्याचे पालन करा

दि. 30/1/2023

धर्माचे नव्हे, कर्तव्याचे पालन करा

धर्म व कर्तव्य  यातील फरक - धर्म हे मानवनिर्मित आहे. धर्म केवळ मानव निर्मित नसून तो स्वार्थपूर्तीसाठी निर्माण झालेला आहे. जगात अनेक धर्म अनेक मानव समुहांकडून वेगळेपणा दर्शवून श्रेष्ठ-कनिष्ठपणा दर्शवून अन्याय अत्याचार, शोषण, लूट करण्यासाठी किंवा दुसर्‍यांना गुलाम बनविण्यासाठी किंवा कानाखाली ठेवण्यासाठी, दाबून ठेवण्यासाठी, दुसर्‍यांना मध्ये न घुसू देण्यासाठी, श्रेष्ठत्व, वेगळेपणा टिकविण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे, म्हणजे धर्म हे कृत्रिम असून तो एक घातक रोग आहे. या धर्माची गरज नसतानाही मानव समुहाने तो अविचारीपणे मानव समुहाला लावून घेतलेला रोग आहे. या धर्म रोगाचा स्वसमुहातील व्यक्तीला किंवा अन्य समुहातील व्यक्ती किंवा समुहाला त्रास झाल्यास, अन्याय झाल्यास दोन्ही समुहात किंवा अनेक समुहात संघर्ष, वाद निर्माण होऊन दोन्ही किंवा अनेक समुहांच्या प्रगतीला, शांतता, सुख, समृद्धीला अडथळा निर्माण होतो. म्हणून धर्म ही बाब अथवा तत्त्व हे मानव समुहाला घातक आणि अनावश्यक आहे हे समजून घेण्याची गरज आहे. मानव समाजाची गरज धर्माने पूर्ण होत नसल्यामुळे गरज पूर्ततेसाठी नियमांची, कायद्यांची, कर्तव्य पालनाची खरी गरज आहे.

          कर्तव्याचा संबंध मानव समुहांशी येतो तर धर्माचा संबंध निर्जीव वस्तू, जीव, जंतू,  पशु-पक्षी, वृक्षवल्ली, पंचतत्त्वाशी येतो. धर्माचा खरा अर्थ- स्वभाव, गुण, वैशिष्ट्ये; विशेषता असा आहे. मानव समूह हा फक्त दोन वर्गांचा समुहाचा आहे. एक पुरुष वर्ग व दुसरा स्त्री वर्ग व तिसरा नपुंसक वर्ग आहे. मानव समुहात असलेल्या पुरुषाचे वैशिष्ट्ये, गुण किंवा स्वभाव हे पेरणे, गाडणे, सांभाळणे, देखरेख करणे, संरक्षण करणे, जन्म देणे असे आहे. आणखी काही अंगभूत गुणवैशिष्ट्ये हे गरजांवर अवलंबून आहेत.

         परंतु निर्जीव वस्तू, जीव-जंतू, पशु-पक्षी, वनस्पती, पाच तत्त्व म्हणजे प्रकृतीचे गुणधर्म, वैशिष्ट्ये, स्वभाव वेगवेगळे असतात. यांनाच त्या वस्तुंचे गुणधर्म म्हटले जाते. मानव समुहाचा संबंध कर्तव्याशीच येतो. या कर्तव्यांना नियम, कायदा, पद्धत, घटना संविधान, शिष्टाचार वगैरे नावाने संबोधले जाते. तर धर्म हा प्रकृतीशीच आहे असे मला वाटते.

         धर्माचा ठसा मानव समुहाला लावू नये, असे माझे प्रामाणिक मत आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी संपूर्ण मानव समूह प्रकृती नियमांचे पालन करीत होता. हे प्रकृती नियम, कल्याणकारी सर्जक, न्यायमुक्त व समतावादी होते, अविकृत होते. परंतु आर्य भारतात आल्यावर व त्यांचे वर्चस्व स्थापन झाल्यानंतर त्यांनी जी विचारधारा, नियम, कायदे केले, हे सर्व नियम, कायदे, विचार प्रकृती नियमांविरुद्ध विकृत, विषमतावादी, अन्यायी, अत्याचारी, स्वश्रेष्इवादी केले व या विचारधारेला त्यांनी वैदिक, मनुवादी, सनातनी, धर्म असे नाव दिले व हे नियम अपरिवर्तनीय बनवून मोडणार्‍यास दंडनीय ठरविल्यामुळे त्यात विकृती, रोगट, अन्यायी, अत्याचारी शक्ती निर्माण झाली. यामुळे ही विचारधारा आजरोजी त्याज्य ठरली आहे. महाविरजी, गौतमजी, कबीर, बसवेशव्र, म. फुले, डॉ. आंबेडकर यांनी निर्माण केलेली मराठा समाजाची शिवसुत्रावली, गोर बंजारा समाजाची धाटी विचारधारा या सर्व अविकृत, समतावादी, न्याययुक्त, कल्याणकारी, सर्जनतावादी असल्यामुळे या सर्वच्या सर्व विचारधारा या आर्य आगमनपूर्वीच्या प्रकृती नियमांना, पूर्वज नियमांना अनुसरून असल्यामुळे मानवतावादी व नियमाचे पालन करणार्‍या सिद्ध होतात. धर्म हा दुसर्‍यांवर अन्याय, अत्याचार करतो. सनातनी म्हणजे अपरिवर्तनयी असतो तर नियम हा सर्वांना न्याय देणारा, गरजेनुसार बदलनारा, लवचिक व सर्वांना जोडणारा असतो. धर्म मात्र अपरिवर्तनीय, अन्यायी व मानव समुहात फूट पाडून विनाश घडविणारा असतो. म्हणूनच आपल्या देशाची घटना, कायदा, संविधान हे कोणत्याही धर्माच्या नव्हे तर धर्मनिरपेक्ष या तत्त्वावर, सिद्धांतावर बनविण्यात आले असून हे संविधान विश्‍वात सर्वश्रेष्ठ आहेत. तेव्हा संविधानाचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. संविधानात सर्व मानव समुहांचे कर्तव्य दर्शविण्यात आले असून संविधानाचे पालन करण्याऐवजी धर्माच्या नावाने गोंधळ घालणे हा समाज, मानव समूह व राष्ट्रद्रोह आहे, यात शंका नाही. संविधानात व्यक्ती, समाज, कुटुंब, राज्य व देशाच्या व विदेशी कर्तव्याचा सुद्धा समावेश आहे. म्हणून संविधान हाच सर्वांचा धर्म मानून त्यावर अंमलबजावणी करणे व संरक्षण करणे, तसेच धर्म हा घरापर्यंच मर्यादित ठेवणे हे सर्वांचे परम कर्तव्य समजावे.

प्रा. ग.ह. राठोड मो. 9881296967

 

Post a Comment

0 Comments