*हे केवळ धर्मांतरण नव्हे ! तर धर्मांतरा आडून राष्ट्रांतर आहे !*
*- फुलसिंग जाधव, औरंगाबाद*
==========================
जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री या गावी येत्या २५ ते ३० जानेवारी या कालावधीत पार पडणाऱ्या विशाल हिंदू गोर बंजारा , लबाना - नायकडा समाज महाकुंभची घोषणा झाल्यापासून आपल्या समाजाचे होत असलेल्या धर्मांतराबाबतची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. जे की समाजासाठी चिंतेची बाब आहे. एक संतापाची लाट समाजात उसळलेली आहे. आमच्यातील कांही लोक तर एका विशिष्ट जाती, धर्माला शिवीगाळ करण्यात मशगूल आहेत. समाज कोणत्या दिशेने जात आहे हे कधी कोणीही पाहिलेच नाही असे म्हणायची वेळ आज आलेली आहे. आपल्या समाजातील बामसेफ विचारधारेचा वर्ग तर अजूनही या गोष्टी मान्य करायला तयारच नाही.
गोद्री महाकुंभची घोषणा झाल्यापासून संपूर्ण समाज ढवळून निघालेला आहे. घाण्यातून तेल काढावे त्याप्रमाणे कुंभ विरोधकांनी आपल्या मेंदूतून नाही नाही त्या प्रकारचे विष काढून समाजात पेरण्याचे आटोकाट प्रयत्न केले. अजूनही वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत. मग त्यात बामसेफवाले, कांही राजकारणीही आहेत. सुरुवातीला गोदरी कुंभबाबत पूर्ण माहिती नसल्याकारणाने अपप्रचार करणाऱ्यांच्या अपप्रचाराला समाज बळीही पडला होता. पण जेंव्हा कुंभ विरोधक कोण आहेत ? कोणत्या विचारधारेचे आहेत ? यांचे मनसुबे काय आहेत? या लोकांचा मागील भूतकाळ काय आहे ? हे समाजाने जेंव्हा तपासून पहायला सुरुवात केली तेंव्हा या लोकांच्या चाली समाजाच्या लक्षात आल्या. आणि समाज खाडकन जागा झाला आणि कुंभाच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. आज कुंभ समर्थकांची संख्या फार मोठी आहे.
*कुंभबाबत गैरसमज*
कुंभ बाबतीत कुंभ विरोधकांनी आपले अज्ञान समाजात भरपूर प्रमाणात पेरून आपले हास्य करुन घेतलेले आहे. आजकाल कुंभ कशा कशाचे भरवले जाते याबाबत कांही उदाहरणं येथे देत आहे. प्रतापगढ राजस्थान येथे 16 ते 18 सप्टेंबर 2022 *शिक्षण महाकुंभ* पार पडले होते. उदयपुर राजस्थान येथे 26 नोव्हेबर2022 व्हील चेअर *क्रिकेट महाकुंभ* पार पडले होते. जलडेगा झारखंड येथे सुद्धा 26 डिसेंबर 2022 *क्रिकेट महाकुंभ* संपन्न झाले होते.
अकोदा मध्यप्रदेश येथे 6 जानेवारी 2022 *क्रिकेट महाकुंभ* पार पडले होते. असे अनेक प्रकारचे कुंभ देशात भरवले जातात.
बरे झाले ! हे लोक त्या प्रांतात नाहीत. अन्यथा त्यांनाही हे विरोध केले असते ! ग्राऊंडवर, हॉलमध्ये कधी महाकुंभ होतो काय म्हणून विचारले असते !
खरे तर आज जवळपास ८०% आपला समाज हिंदू पद्धतीने जीवन जगतो आहे. त्याला कोणतीही अडचण नाही. हिंदू म्हणून जगत असतांना त्यांने ना आपली भाषा सोडली ना संस्कृती. जे कांही सोडल्यासारखे वाटले आहे तो काळानुरूप झालेला बदल आहे. या बदलाला कोणीही रोखू शकत नाही. साठ वर्षापूर्वी आम्ही जे तांडा जीवन जगलो त्यापैकी आज 10% ही तांडा संस्कृती शिल्लक राहिलेली नाही. त्याचे कारण म्हणजे प्रवाहाबरोबर चालणे होय. बदलत्या काळानुसार बदलणारा समाज सर्वांनी स्विकारला पाहिजे. विशेषत: हिंदू म्हणून जगतांना कोणत्याही परिवाराची ना पीछेहाट झाली. ना विकासात बाधा आली. पण आपल्या समाजातील बामसेफवाले, धम्मवादी लोकांना हे आजही देखवत नाही. अलिकडे या बामसेफ, धम्मवादी लोकांना बदलत्या समाजाची मात्र जास्त अडचण होऊ लागलेली दिसते. म्हणून या लोकांनी कुंभ बाबत जो विषारी अपप्रचार केला ते अतिशय निंदनीय आहे. त्यात प्रामुख्याने - हिंदू शब्द का ? पोहरादेवीचे पावित्र्य नष्ट करीत आहेत, पर्यायी काशी तयार करण्याचे षडयंत्र आहे, पोहरादेवी संकटात आली आहे, समाजाला हिंदू बनवण्यात येत आहे, धाटी संपवण्याचे कटकारस्थान आहे , गोद्रीला कोणतीही धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी नसतांना गोद्री येथेच कुंभ का ? आम्ही निसर्ग पुजक, निधर्मी लोक आहोत. आमचा धर्माशी काय संबंध ? असे नाना प्रकारचे बालिश प्रश्न उपस्थित करुन समाजात संभ्रम निर्माण केला गेला . समाजाला धन्यवाद द्यायला पाहिजे त्याने आपला विवेक जागवला आणि शांत मनाने गोदरी कुंभापाठीमागील भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. या लोकांच्या अपप्रचाराला बळी पडलेले अधिकांश लोक आज या कुंभकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहेत.
*न जाणारी जुनी खोड*
ज्या लोकांना या जन्मात नव्हे तर असे हजारो जन्म घेऊनही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्व धम्म यांना कळणार नाही. पण आम्हाला डॉ. आंबेडकर आणि बौद्व धम्म खुपच कळलेले आहे असे भासवणारे बामसेफी आणि नकली आंबेडकरी विचारधारेचे लोक या ना त्या कारणाने वारंवार समाजात घाण पसरवत असतांना दिसतात. चर्चेचा मार्ग सोडून समाजाच्या साधु संतांची बदनामी करणे ही या लोकांची जुनी खोड आहे. लक्षचंडीच्या वेळेस सुद्धा पोहरादेवी येथून चर्चेचा प्रस्ताव असतांना या बामसेफी, धम्मवादी लोक चर्चा करण्यास पुढे आले नाहीत. यावेळी सुद्धा त्यांनी हिच भूमिका घेतली. यावरुन हे लोक कोणत्या मानसिकतेचे आहेत हे सहज लक्षात येते. चर्चेने प्रश्न सुटतात या गोष्टीवर यांचा विश्वासच नाही हे त्यांच्या कृती आणि वृत्तीने वारंवार सिद्ध करीत असतात.
कुंभ आयोजनापूर्वी जे लोक धाटीपासून हजारो कोस दूर होते. कुंभ जाहिर होताच अचानक त्यांच्या अंगात धाटी कशी आली ? याचे कारण शोधले तर लक्षात येईल की, गेल्या अनेक वर्षापासून ते जे विचार समाजात पेरत होते. त्यांचे बिंग फुटू नये म्हणून त्यांनी धाटीच्या बिळात घुसण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला होता हे आता उघड झालेले आहे.
*एक घाव दोन तुकडे ...!*
आता यांना निक्षुण सांगणे आहे की, बाबांनो ! तुमचा आणि आमचा मार्ग वेगवेगळा आहे. हे दोन मार्ग आता कधीच एकमेकांना जोडल्या जाणार नाहीत . म्हणून तुम्ही तुमच्या जागी आनंदाने रहा. आम्ही आमच्या जागेवर आनंदात राहु. आता यापुढे समाज नासवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. साधु संतांची बदनामी आणि व्यक्तिगत चारित्र्यहनन करण्याचे प्रकार यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.
*आपापसात संघर्ष कशाला?*
काय चांगले आणि काय वाईट हे समजण्या इतपत समाज एवढा दूधखुळा नक्कीच नाही. या देशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी समाजाला कोणत्या न कोणत्या तरी धर्माचा आधार घेणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील धोके या लोकांना दिसत नसतील पण आम्हाला दिसत आहेत. म्हणून एखाद्या जातीशी, धर्माशी अकारण वैरभावना कोणत्याही परिस्थितीत समाजाला परवडणारी नाही. म्हणून समाजाला अडचणीत आणू इच्छिणाऱ्या विचारधारेपासून समाजाला दूर ठेवणे समाज हिताचे आहे. समाजाची शक्ती समाजाच्या विकासासाठी लागावी ही आमची प्रांजळ भूमिका आहे. नको त्या वादात, एखाद्या जाती, धर्माविरुद्ध समाजाची शक्ती वाया जाऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे. म्हणून आम्ही समाजाचे हित कशात आहे हे वारंवार समाजाला समजावून सांगत आलेलो आहोत.
*धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतर होय !*
जगातील कोणताही धर्म वाईट नाही. सर्व धर्म मानवाच्या कल्याणासाठीच आहेत. आज सर्वच धर्म बदनाम असण्याचे कारण म्हणजे त्या धर्माच्या वाहकांची असलेली शूद्र मानसिकता !
या देशाला ख्रिश्चन धर्माची कोणालाही अडचण नाही. खरी अडचण आहे ती मिशनरीच्या मानसिकतेची . या देशात जे लोक व्यापाराच्या निमित्ताने आले होते आणि हळूहळू या देशात जम बसवून दीडशे वर्ष राज्य केले. त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला या बाबीकडे आम्हाला दुर्लक्ष करुन कसे चालेल ? गेल्या अनेक वर्षांपासून या देशात मिशनरीवाले ज्याप्रकारे सेवेचे नाव पुढे करून आपला धर्म या देशात वाढवीत आहेत. ती एक प्रकारची धोक्याची घंटा आहे. या देशात होणारे धर्मांतरण वरकरणी दुर्लक्ष करण्यासारखे वाटत असले तरी ते या देशाला अजिबात परवडणारे नाही.
हिंदू धर्माला विरोध म्हणजे मिशनरीचे हात बळकट करण्याचे पाप करणे होय. हिंदू धर्माविषयी किंवा ब्राह्मण समाजाबाबत आपली नाराजी जरी असली तरी ते घरातील भांडण आपण घरात सोडवू शकतो. पण कोणत्याही परिस्थितीत परकीय शक्तीला बळ देता कामा नये. नेमके हेच आज विविध प्रकारे घडत आहे. आज होणारे हे धर्मांतरण असेच चालू राहिले तर तो दिवस दूर नसेल भारत नावाच्या देशात पोपचे साम्राज्य नसेल ! आज धर्मांतरण हे कोण्या एका जातीची, समाजाची समस्या नाही. तर ती एक गंभीर राष्ट्रीय समस्या बनलेली आहे. या समस्येकडे सर्वांनी गांभिर्याने पाहण्याची नितांत गरज आहे.
एका राष्ट्रीय संकल्पात आमचा समाज सहभागी होणे गैर नाही. गोदरी कुंभ हे धर्मांतराला आळा बसवण्यासाठी ठेवलेले महत्वपूर्ण पाऊल आहे. या कुंभद्वारे समाजाचे कोणतेही नुकसान अजिबात होणार नाही. झाला तर फायदाच होणार आहे. आरएसएस बाबतची भीती सुद्धा निरर्थक आहे. आपला समाज स्वाभिमानी आहे. आपला स्वाभिमान गहाण ठेऊन कुणाचीही गुलामी तो पत्करणार नाही. ही बाब सर्व परिचित आहे. मग भीती कशाची ? या कुंभद्वारे समाज धर्मांतरणबाबत सतर्क, जागृत जरी झाला तरी या कुंभचे ते मोठे यश असेल.
हा कार्यक्रम समाज हिताचा आहे. कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने यात मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवायचा आहे. आणि आपल्या एकतेचे दर्शन घडवायचे आहे.
*आता जेमतेम विस दिवस उरलेले आहेत . या उर्वरीत दिवसात चलो गोद्रीचा नारा प्रत्येक ठिकाणी गुंजला पाहिजे !*
*चलो गोद्री ! चलो गोद्री !! चलो गोद्री !!!*
दिनांक : 4 जानेवारी 2023
*- फुलसिंग जाधव, औरंगाबाद*
संपर्क : 8999098265
==========================
0 Comments